महाबळेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या होत आहे कमी ; लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने घालावे लक्ष
महाबळेश्वर टाईम्स : ☝
महाबळेश्वर: सातारा
महाबळेश्वर हे पर्यटन ठिकाण महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. या मिनी काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या दिवसान दिवस कमी होत आहे. लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्यात. तसेच नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीवरबरोबर पार्किंगचाही प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा स्थानिक नागरिक, व्यावसायिक व पर्यटक करीत आहेत.
लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनाने याकडे गंभीरतेने बघून पर्यटकांना आणखीन चांगल्या सुविधा कशा मिळतील यावर भर दिला पाहिजे. महाबळेश्वर, पाचगणीसह साताऱ्यात मे महिन्यापासून पाऊस सुरू असून, नोव्हेंबर उजाडला, तरी गिरिस्थानांवर जुलै-ऑगस्टसारखे धुके आणि पाऊस आहे. याचा थेट फटका पर्यटनाला बसला असून, स्ट्रॉबेरी उत्पादकही लागवडीसाठी उघडीप मिळत नसल्याने चिंतेत आहेत. यंदा ऑक्टोबर अखेरपर्यंत सुमारे साडेपाच लाख पर्यटक महाबळेश्वरमध्ये आले. कोविडपूर्व २०१८-१९ ची एकूण पर्यटक आकडेवारी १९ लाख आहे. अजून आर्थिक वर्ष संपायला पाच महिने असले, तरी २०१८-१९ चा आकडा गाठला जाईल का, याबाबत साशंकता आहे. कोविड काळानंतर २०२२-२३ मध्ये चार लाख, २०२३-२४ मध्ये नऊ लाख असा गेल्या दोन वर्षांतील पर्यटकांचा राबता दिसतो आहे, जो वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीपेक्षा कमी आहे.
पर्यटकांची संख्या कमी झाल्यामुळे पालिका प्रशासन, छोटे-मोठे व्यावसायिक, हॉटेलचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यंदा मे महिन्याच्या मध्यावरच पाऊस सुरू झाल्याने पर्यटकांची भटकंती बंद झाली. शाळांच्या वार्षिक परीक्षा संपल्या की, एप्रिल-मे महिन्यात महाबळेश्वर, पाचगणी, कास पठारावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप असते. येथील हिरवागार निसर्गरम्य परिसर, थंड हवामान, ऐतिहासिक किल्ले, प्राचीन स्थापत्यशास्त्रातील मंदिरे आणि सुंदर तलाव पर्यटकांना आकर्षित करतात. पुस्तकांचे गाव भिलार, मॅप्रो गार्डन, ‘मालाज्’चे खाद्यपदार्थ तसेच हिरवागार निसर्ग व थंडगार वातावरणाचा आनंद घेण्यासाठी देशविदेशातून अनेक पर्यटक येथे येत असतात त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल होते.
पुढे पावसाळी पर्यटन आणि दिवाळी सुटीतही मोठी आर्थिक उलाढाल होते. महामार्गापासून सुरूर, वाई, पाचगणी, महाबळेश्वर मार्गाच्या रखडलेल्या कामामुळे आधीच पर्यटक हैराण झालेले आहेत. हा मार्ग तातडीने पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न करावेत.
हॉटेल, पर्यटन, वाहन व्यावसायिकांना आता अवकाळी पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.सुट्यांमध्ये होणाऱ्या मोठ्या आर्थिक उलाढालीवरच इतर महिन्यांचे खर्च भागत असतात; पण या वर्षी मात्र अवकाळी पावसामुळे ही सारी गणिते बिघडली आहेत. कर्ज काढून भाडेतत्त्वावर हॉटेल चालवणाऱ्या व्यावसायिकांची अवस्था बिकट झाली असून ते आर्थिक संकटात सापडलेले आहेत. वेण्णा लेकच्या बोटिंगमधून आणि पर्यटकांच्या येण्यामुळे वन विभाग आणि पालिकेला मोठे आर्थिक उत्पन्न मिळते, तेही पर्यटकांची संख्या कमी झाल्यामुळे त्यावरही मोठा परिणाम झाला आहे.
मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरमधील रस्ते खराब झाले आहेत. मुंबई, पुणे आणि राज्यभरातून, तसेच परराज्यांतून येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. पावसाने पर्यटकांनी आपली आरक्षणे (बुकिंग) रद्द केली आहेत. त्याचा व्यवसायांना मोठा फटका बसत आहे. यामुळे एकूणच महाबळेश्वर येथील व्यवसायकांचे अर्थकारण बिघडले आहे.






Social Plugin